Shaktipeeth Highway | नियोजित ‘शक्तिपीठ महामार्गा’मुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी आग्रही मागणी सांगली जिल्ह्यातील तब्बल १२ ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामसभांमध्ये ठराव करून केली आहे. नागरिकांची कोणतीही मागणी नसताना केवळ ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी शासन हा महामार्ग रेटत असल्याचा आरोपही या ग्रामसभांमधून करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. (Shaktipeeth Highway)
महामार्गाचा मार्ग आणि बाधित गावे
पवनार येथून सुरू होणारा हा महामार्ग सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे प्रवेश करणार आहे. तेथून खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मिरज तालुक्यातील मतकुणकी, कवलापूर, बुधगाव, बिसूर, कर्नाळ, पद्माळे आणि सांगलीवाडी या गावांतून हा महामार्ग जाणार आहे.
तीन गावांचा अपवाद वगळता ठराव एकमताने मंजूर
विशेष म्हणजे, या मार्गावरील शेटफळे, तिसंगी आणि बाणूरगड या तीन गावांचा अपवाद वगळता इतर सर्व म्हणजे १२ गावांनी महामार्ग रद्द करण्याबाबतचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. “आमच्या गावातील शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नको,” अशी भूमिका या गावांनी घेतली आहे. (Shaktipeeth Highway)
महापुराचा धोका वाढणार
या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात भराव टाकला जाणार असल्याने नदीकाठची गावे कायमची महापुरात बुडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.(Shaktipeeth Highway)
Title : 12 Villages in Sangli Oppose ‘Shaktipeeth Highway’