Success Story l सांगली (Sangli) जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांपैकी एक असलेल्या कडेगाव तालुक्यात सिंचन प्रकल्पांमुळे बागायत शेती फुलू लागली आहे. याच तालुक्यातील वांगी गावाला 3600 हेक्टर इतके सर्वाधिक क्षेत्र असून येथील शेतकरी उत्तम शेती करतात. वांगी येथील प्रकाश वसंत गुरव यांनी ऊस शेतीला (Sugarcane Farming) फाटा देत शेवंती फुलशेतीचा (Chrysanthemum Farming) यशस्वी प्रयोग केला आहे आणि भरघोस नफा कमावला आहे.
ऊस शेतीला पर्याय शोधताना :
वांगी गावचे प्रकाश वसंत गुरव यांची वांगीच्या माळरानावर 50 गुंठे खडकाळ शेती आहे. या भागामध्ये ताकारी उपसा सिंचन योजनेचे (Takari Lift Irrigation Scheme) मुबलक पाणी आहे. गुरव आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने ऊसाचे पीक घेत होते. परंतु, ऊस शेतीतून वर्षातून एकदाच उत्पन्न मिळते. अल्पभूधारक असल्याने वर्षातून एकदाच मिळणारे उत्पन्न गुरव यांना फायदेशीर वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकाचा शोध सुरू केला.
Success Story l भाच्याच्या सल्ल्याने फुलवली शेवंती :
सातारा (Satara) जिल्ह्यातील पाली (Pali) गावचे त्यांचे भाचे युवा शेतकरी अक्षय इंजेकर (Akshay Injekar) यांनी प्रकाश गुरव यांना शेवंती फुलशेतीबाबत माहिती दिली. भाच्याच्या सल्ल्याने प्रकाश यांनी ऊस पीक काढून शेवंती फुलवण्याचा धाडसी निर्णय घेतला. श्रावण महिन्यात त्यांनी शेवंतीची लागवड केली. मात्र, यंदाच्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rains) त्यांना सामना करावा लागला. अति पावसामुळे नुकतीच लागवड केलेली शेवंतीची रोपे त्यांनी 20 ते 25 दिवस मोठ्या कष्टाने जगवली. खडकाळ माळरान असूनही सततच्या पावसातही त्यांनी शेवंती फुलवली.
50 गुंठ्यात 15 हजार रोपांची लागवड :
प्रकाश गुरव यांनी आपल्या 50 गुंठे शेतात मशागत करून उंच बेड आणि ठिबक सिंचनाची (Drip Irrigation) व्यवस्था केली. यामध्ये त्यांनी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या आकर्षक शेवंतीची 15 हजार रोपे लावली. आई-वडील, पत्नी, मुलगा अशा संपूर्ण कुटुंबाच्या साथीने त्यांनी शेवंतीच्या रोपांची चांगली जोपासना केली. वेळोवेळी भाच्याचे मार्गदर्शन आणि गुरव कुटुंबाची मेहनत यातून अवघ्या 3 महिन्यात शेवंती फुलाचे उत्पादन सुरू झाले.