Pimpri-Chinchwad l एचपी चौक ते महाळुंगे पोलिस चौकी, महाळुंगे पोलिस चौकी ते इंडोरन्स चौक आणि इंडोरन्स चौक ते एचपी चौक हा मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आला. परिणामी, वाहतूक जलद झाली असली तरी अपघातांचे प्रमाणही चिंताजनक रित्या वाढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रमुख चौकांमधून वाहतूक पोलिसही (Traffic Police) गायब झाल्याने अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही, अपघात रोखण्यासाठी अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
चाकण, रांजणगाव, कारेगाव, सुपा, अहमदनगर (Ahmednagar) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) एमआयडीसीतील (MIDC) कंपन्यांमध्ये कच्चा आणि पक्का माल घेऊन जाणारी दररोज हजारो वाहने चाकण-तळेगाव महामार्गावरून ये-जा करतात. मात्र, या महामार्गाचे विस्तारीकरण रखडल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत (Traffic Jam) भर पडत होती. ही कोंडी सोडवण्यासाठी, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Traffic Police) हा मार्ग एकेरी करण्याचा निर्णय घेतला.
एकेरी मार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा :
वाहतूक पोलिसांनी एचपी चौक ते महाळुंगे पोलिस चौकी, महाळुंगे पोलिस चौकी ते इंडोरन्स चौक आणि इंडोरन्स चौक ते एचपी चौक हा मार्ग वाहतुकीसाठी एकेरी केला. यामुळे वाहने सुसाट धावू लागली आणि वाहतूक कोंडी कमी झाली. मात्र, अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नुकताच बुधवारी (दि. २२) संकेतकुमार साहू याचा एमआयडीसीची कमान, महाळुंगे पोलिस स्टेशनजवळून पायी चालत जात असताना भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.
या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवतात. तसेच, अनेक ठिकाणी चुकीच्या दिशेने वाहने चालवण्याचे प्रकारही घडत आहेत. याशिवाय, या मार्गावरील एचपी चौक, महाळुंगे पोलिस चौकी, इंडोरन्स चौक या तीनही प्रमुख चौकांत सिग्नल यंत्रणा (Traffic Signal) नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो.
Pimpri-Chinchwad l प्रमुख चौकांतून वाहतूक पोलिस गायब :
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा मार्ग एकेरी करण्यात आला. मात्र, या मार्गावरील वर्दळीच्या चौकांमधून वाहतूक पोलिस गायब झाल्याचे चित्र आहे. एकेरी मार्ग करण्यापूर्वी चौका-चौकांत वाहतूक पोलिस वाहतूक नियोजनासाठी थांबायचे. मात्र, आता चौकाचौकांतून ते गायब झाले आहेत. त्यामुळे वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे.
चासोली, तळेगाव, चाकण आणि एमआयडीसीतून येणारी वाहने एचपी चौकात एकत्र येतात. येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, या चौकात वाहतूक पोलिस थांबत नाहीत. त्यामुळे तीनही बाजूने वाहने चौकात आल्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघाताचा धोका वाढतो. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.