Ajit Pawar | राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत (Farmer Loan Waiver) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उल्लेख मी कधी केलाच नव्हता, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे संकेत मिळाल्याने विरोधकांकडूनही टीकेचा भडिमार करण्यात आला. मात्र, या वादानंतर शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवार यांच्यावर माध्यमांमध्ये आलेल्या काही वृत्तांमुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यामध्ये त्यांनी कर्जमाफीला विरोध केला असल्याचे सांगितले गेले. या वृत्तांवर नाराजी व्यक्त करत पवारांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली आणि चुकीच्या बातम्या देणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला.
प्रसारमाध्यमांवर अजित पवारांचा हल्लाबोल
अजित पवारांनी (Ajit Pawar) कर्जमाफीला विरोध केला असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये चांगलेच गाजले होते. मात्र, पवारांनी यावर बोलताना स्पष्ट केले की, “मी कधीच कर्जमाफीला विरोध केला नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यावर माझा कायम भर असतो. आम्हीदेखील शेतकरी आहोत, त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावर कुठल्याही चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नयेत,” असे ते म्हणाले.
त्यांनी माध्यमांवर जोरदार टीका करत सांगितले की, “सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जाणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. जर मला काही म्हणायचं असेल तर मी स्वतः स्पष्टपणे बोलेन. मात्र, ‘सूत्रांच्या’ आधारे बातम्या चालवल्या जातात आणि त्यामुळे खोटी बदनामी होते,” असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांसाठी अजित पवारांचा पाठिंबा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत पवारांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हा निर्णय आम्ही सकारात्मक दृष्टीने घेणार आहोत. जिथे शक्य असेल तिथे शेतकऱ्यांना मदत करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करू.” याशिवाय, “सूत्रांच्या हवाल्याने चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार द्यायला हवा,” अशी खोचक टिप्पणीही पवारांनी(Ajit Pawar) केली.
त्यांच्या या विधानामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा कर्जमाफीबाबत आशावाद निर्माण झाला आहे. पवारांनी विरोधकांवर निशाणा साधत स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही नेहमीच प्राधान्य दिलं आहे.”
Title: Ajit Pawar Denies Opposing Farmer Loan Waiver