Ajit Pawar | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Raj Thackeray) राज ठाकरे आणि (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे एकत्र येणार का, यावर राज्यात जोरदार चर्चा रंगली असताना, उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवारांनी आपल्या खास शैलीत या चर्चेला उत्तर देत पत्रकारांनाच सुनावले.
काय म्हणाले अजित पवार?
मनसे आणि शिवसेना युतीची शक्यता निर्माण झाल्यानंतर, माध्यमांनी अजित पवारांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ही एकाच कुटुंबातील बाब आहे. उद्धव आणि राज हे दोघेही स्वतंत्र पक्षाचे प्रमुख आहेत. कोणाशी युती करायची, हा पूर्णतः त्यांचा वैयक्तिक व राजकीय निर्णय आहे. इतर कुणालाही नाक खुपसायची गरज नाही.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “जर दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना आणि ठाकरे बंधूंनाही एकत्र यावं असं वाटत असेल, तर इतर पक्षांनी त्यात हस्तक्षेप करू नये. प्रत्येकजण आपला निर्णय विवेकबुद्धीने घेतो. कोण एकत्र येईल, कोण विभक्त राहील, हे त्यांचं त्यांचं ठरवायचं असतं.”
राज ठाकरेही युतीबाबत सकारात्मक?
दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीच्या चर्चांवर राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. “कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आपले वैयक्तिक मतभेद हे फार किरकोळ असतात. महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणं गरजेचं आहे,” असं राज यांनी सांगितलं.
राज म्हणाले, “हे विषय माझ्या स्वार्थाचे किंवा केवळ इच्छेचे नाहीत. महाराष्ट्र, मराठी माणसाचं अस्तित्व जपणं हे माझं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणूनच एकत्र येणं कठीण आहे असं वाटत नाही. परंतु यामागे दोघांचीही इच्छा हवी.”
महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास भाजप व इतर पक्षांना जबरदस्त टक्कर मिळू शकते, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अशा स्थितीत अजित पवारांच्या ‘दादा स्टाईल’ उत्तराची चर्चा रंगली आहे.
Title : Ajit Pawar on Raj-Uddhav Thackeray Alliance