Ajit Pawar statement l पिंपरी-चिंचवडमध्ये काल पार पडलेल्या विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं. “मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो, पण तळ्यात-मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत,” असं स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये खळबळ उडवली.
या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमधील आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करत, अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, “माझ्या हातात हे शहर होतं, महापौर, विरोधी पक्षनेते यांसारखी अनेक जबाबदाऱ्या मी पार पाडल्या. स्वार्थ न पाहता जनतेच्या विकासासाठी काम केलं.”
“अण्णा बनसोडे गरीब कुटुंबातून आले, पण मोठं यश मिळवलं” :
अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांच्या प्रवासाचं कौतुक करत म्हणाले की, “पानटपरी चालवणारे अण्णा आज आमदार, आणि आता विधानसभा उपाध्यक्ष झाले आहेत. त्यांनी कधी हार मानली नाही. 1991 मध्ये मी इथे आलो, तेव्हा गाववाले आणि बाहेरचे अशी चर्चा होती, पण अण्णा आता पूर्णपणे इथलेच झाले आहेत.”
शहरातील नदी व कचऱ्याचा प्रश्नही त्यांनी अधोरेखित केला. “काही जण वेगळं बोलतात, त्यांचं म्हणणं ग्राह्य धरलं पाहिजे, जर त्यात तथ्य असेल आणि जनतेच्या अडचणी दूर होत असतील, तर आपण एक पाऊल मागे-पुढे टाकायला तयार आहोत,” असं मत त्यांनी मांडलं.
Ajit Pawar statement l “ट्रम्प धोरण, कोविड आणि लोकसंख्येचा संदर्भ” :
आपल्या भाषणात त्यांनी जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेचाही उल्लेख केला. “डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे अनेक देशांना फटका बसला आहे. कोविडनंतरचं हे सर्वात मोठं संकट आहे,” असं मत मांडत त्यांनी स्थानिक प्रश्नांच्या जोडीला जागतिक मुद्द्यांनाही स्पर्श केला.
याच कार्यक्रमात अजित पवारांनी आपल्या मिष्कील शैलीने टोलेही लगावले. “लोकसंख्या वाढायला वेळ लागत नाही, लोकांनी जर मनावर घेतलं तर लोकसंख्या वाढते,” असं म्हणत उपस्थितांमध्ये हास्याचं वातावरण निर्माण केलं.