कोलकाता | एका बाजूला भाजपचा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा धडाक्यात प्रचार चालू आहे. तर दुसरीकडे वृत्तपत्रांमध्ये पंतप्रधान निवास योजनेच्या यशाचा दिंडोरा पिटवणाऱ्या खोट्या जाहिराती छापल्यामुळे भाजप पक्ष चांगलाच अडचणीत आल्याचं दिसत आहे.
सबका साथ सबका विकास आणि प्रत्यक्षात केलेली अंमलबजावणी या मुद्द्यांवरुन विरोधक कायम मोदी सरकारला निशाण्यावर धरत असतात. त्याआधारे भाजपकडून काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमधील अनेक वृत्तपत्रांमध्ये ‘आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर बंगाल’ अशा हेडलाईने जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पंतप्रधान निवास योजनेचे लाभार्थी म्हणून एका लाभार्थी महिलेचा फोटो आणि 24 लाख कुटुंबाना घरकुल मिळाल्याचा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी जाहिरातीतल्या महिलेचा शोध घेतला. त्या महिलेचं नाव लक्ष्मी देवी असं आहे. जाहिरात पाहिल्यानंतर हा फोटो आपलाच आहे हे लक्ष्मी देवी यांना समजले. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांची अधिक चौकशी केली तर दुसरीच बाजू समोर आली. लक्ष्मी देवी यांना पंतप्रधान निवास योजनेतंर्गत कोणतंही घर मिळालेलं नाही हे सत्य उघडकीस आलं आहे.
लक्ष्मी देवी गेल्या 40 वर्षांपासून कोलकातामध्ये राहत आहेत. त्या मलागा लाइन परिसरात राहतात. पतीच्या मृत्यूनंतर परिवाराची सगळी जबाबदारी लक्ष्मी देवी यांच्यावर पडली आहे. त्यांना तीन मुलं आणि तीन मुली आहेत. या सगळ्यांची लग्न झाली आहेत. दोन मुलं माझ्यासोबत राहतात. ते कुरिअर पोहोचवण्याचं काम करतात. यामधून त्यांना दिवसाला 200 ते 300 रुपये मिळतात, असं लक्ष्मी देवी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मोदी सरकारकडून लक्ष्मी देवी या पंतप्रधान निवास योजनेच्या लाभार्थी असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, लक्ष्मी देवी या प्रत्यक्षात भाड्याच्या लहानशा घरात राहतात. त्यासाठी लक्ष्मी देवी महिन्याला 500 रुपये भाडे भरतात. मात्र वृत्तपत्रांमध्ये आपला फोटो पाहिल्यापासून त्या प्रचंड संतापल्या आहेत. मुळात हा फोटो कधी घेतला गेला याची माहितीही लक्ष्मी देवी यांना नाही. त्यांनी सगळया स्थानिक वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन माझं छायाचित्र का छापलं, अशी विचारणा केली. तेव्हा हा फोटो वृत्तपत्रांनी छापला नसून केंद्र सरकारने जाहिरात दिल्याचं स्पष्ट झालं. या घटनेमुळे मात्र भाजपची चांगलीच नाचक्की झाल्याचं दिसत आहे.
थोडक्यात बातम्या –
दीदी, हवं तर मला लाथा मारा पण…- पंतप्रधान नरेंद्र मोदी
“चार कोंबड्या, दोन कावळे मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय आणि एनआयएला पाठवेल”
शरद पवारांनी उदाहरण दिलेले ‘ज्युलिओ रिबेरो’ आहेत तरी कोण?
“काँग्रेसनं महाराष्ट्र सरकारमधील पाठिंबा काढून घ्यायला हवा”
“बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती”
Comments are closed.