Maharashtra Cabinet Decisions l पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या त्रिशताब्दीनिमित्त राज्य सरकारने चौंडी (Chaundi) येथे ऐतिहासिक कॅबिनेट बैठक घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत चौंडी गावाचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अहिल्यादेवींच्या गौरवासाठी स्मृतीस्थळाचा विकास :
त्रिशताब्दीनिमित्त चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मृतीस्थळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ६८१ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. याशिवाय, एका प्रेरणागीताचे आणि विशेष डाक तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. या स्मृतीस्थळाचा अखिल भारतीय स्तरावर विकास करून तीर्थस्थळात रुपांतर करण्याचा मानस सरकारने व्यक्त केला.
या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांसाठीही मोठे निधी मंजूर करण्यात आले. तुळजाभवानी मंदिरासाठी १८६५ कोटी, महालक्ष्मी मंदिरासाठी १४४५ कोटी, ज्योतिबा मंदिरासाठी २५९ कोटी, त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी २७५ कोटी, माहूर गडासाठी ८२९ कोटी आणि अष्टविनायक मंदिरांसाठी १४७ कोटी रुपयांच्या योजनांना मान्यता मिळाली. या सर्व योजनांचा एकूण खर्च तब्बल ५ हजार ५२० कोटी रुपये इतका आहे.
Maharashtra Cabinet Decisions l कुंभमेळ्यासाठी विशेष कायदा आणि पायाभूत सुविधा :
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला आहे. चौंडी येथील सूतगिरणीसाठी ८०.९० कोटी आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याच्या कामासाठी ३९४.०४ कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित होते.
अहिल्यादेवींच्या जलनीतीच्या प्रेरणेने राज्यातील घाट, तलाव आणि विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी पावले उचलण्यात आली आहेत. एकूण १९ विहिरी, ३४ जलाशय पुनरुज्जीवित केले जाणार आहेत. याशिवाय, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स उभारण्यात येणार आहेत. राहुरी येथे वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालय उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला.
धार्मिक पर्यटनासह ग्रामीण विकासाची दिशा :
या निर्णयांमुळे केवळ धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार नाही, तर स्थानिक पातळीवर विकासाचे नवीन दालन खुले होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौंडीच्या ऐतिहासिक महत्त्वाचे पुनर्स्मरण करून अहिल्यादेवींच्या विचारांनुसार राज्यभरात विकास साधण्याची भूमिका स्पष्ट केली.