CM Devendra Fadnavis | पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधी हिंदूंना (Sindhi Hindus) देश सोडावा लागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सोमवारी मांडली. दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात वास्तव्यास असलेल्या सिंधी हिंदू लोकांना घाबरण्याचे कारण नाही, असं त्यांनी सांगितलं. फडणवीस म्हणाले की, “जे नागरिक भारतात दीर्घकाळापासून वास्तव्यास आहेत, त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त काही विशिष्ट प्रकरणांमध्ये, जिथे नियमभंग झाला आहे, तिथेच कारवाई होईल.”
नियमभंग करणाऱ्या नागरिकांवरच कारवाई-
यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, अशा नागरिकांवरच कारवाई होते जे दीर्घ मुदतीच्या व्हिसाचा गैरवापर करतात. सिंधी समाजातील लोक भारतात शांततेने राहत असून, त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारने ठाम भूमिका घेतली आहे. त्यांना देश सोडावा लागेल, अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झालेली नाही. उलट, अशा नागरिकांना भारतातच राहण्यासाठी अधिकृत प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर योग्य ती मदत केली जाईल, असंही ते म्हणाले.
दीर्घकाळ वास्तव्यास असणाऱ्यांची चिंता दूर-
केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक नागरिकांना दीर्घ मुदतीचा व्हिसा दिला आहे. यामध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पारशी या धर्मीयांचा समावेश आहे. विशेषतः महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे भारतात स्थलांतरित होणाऱ्यांना ही सवलत दिली जाते. भारतात आलेल्या या नागरिकांना केंद्र शासनाकडून नागरिकत्व कायद्यानुसार संरक्षण दिलं जातं. त्यामुळे अनेक वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांना कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही, असं प्रशासनाचं मत आहे.
स्थायी नोंदणीकृत नागरिकांचं संरक्षण कायम-
मुंबईसह महाराष्ट्रात २९ जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानातून स्थलांतरित झालेले २१ हजारांहून अधिक नागरिक स्थायिक झाले आहेत. त्यापैकी बहुतांश जण सिंधी समाजाचे आहेत. अनेकांनी व्यवसाय, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आपलं योगदान दिलं आहे. त्यांना हटवण्याची प्रक्रिया सुरु असल्याच्या अफवांवर फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, सरकार अशा नागरिकांच्या पाठिशी उभं आहे आणि त्यांच्या विरोधात कुठलीही अन्यायकारक कारवाई होणार नाही.