Mumbai Alert | भारताने ऑपरेशन ‘सिंदूर’ (Opration Sindhoor) अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आणि तटरक्षक दलाकडून समुद्रकिनाऱ्यांवर सतर्कता वाढवण्यात आली असून, ‘सागरी कवच’ ही व्यापक सुरक्षा मोहीम सुरु करण्यात आली आहे.
सागरी भागात गस्त वाढली; ड्रोन आणि CCTV द्वारे नजर :
मुंबई पोलिस आणि तटरक्षक दलाने संयुक्तरीत्या किनारपट्टी भागांमध्ये सुरक्षा वाढवली आहे. समुद्रमार्ग, बंदरे, गोदी आणि मच्छीमारवाड्यांवर गस्तीसोबतच ड्रोन आणि CCTV यंत्रणेद्वारे चोख लक्ष ठेवले जात आहे. कोणतीही अनधिकृत हालचाल दिसल्यास त्वरित कारवाईसाठी पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.
‘सागरी कवच’ मोहिमेंतर्गत मच्छीमारांनाही अलर्ट करण्यात आले आहे. बोटींच्या हालचाली, नोंदणी आणि कोणत्या दिशेने जाणार आहेत याची तपासणी काटेकोर केली जात आहे. या मोहिमेचा उद्देश म्हणजे समुद्रामार्गे घुसखोरी रोखणे आणि मुंबईसारख्या संवेदनशील शहराची सुरक्षा बळकट करणे.
Mumbai Alert | सिद्धिविनायक मंदिराचा भाविकांसाठी मोठा निर्णय :
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर (Mumbai Sidhivinayak Temple) प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता गणरायासमोर हार आणि नारळ अर्पण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, गर्दीच्या वेळी मंदिर परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे.
भारतीय लष्कराने पंजाब, अंबाला, राजस्थान आणि हरियाणातील सीमावर्ती गावांमध्ये ब्लॅकआऊट केल्याचे समजते. पाकिस्तानच्या कुरापतींना सडेतोड उत्तर देताना भारताने इस्लामाबादपासून कराचीसह अनेक शहरांवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे भारतात उच्च पातळीवर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत.