Raj Thackeray Congress Support | ठाकरे बंधू काल (5 जुलै) प्रथमच एका व्यासपीठावर आले आणि मराठी अस्मितेचा हुंकार भरला. पण त्याच पार्श्वभूमीवर भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव उर्फ ‘निरहुआ’ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मराठीचा मुद्दा तापलेला असतानाच काँग्रेसनेही आता या वादात उडी घेतली असून राज ठाकरेंच्या बाजूने भूमिका घेत निरहुआला फटकारलं आहे.
निरहुआचं चिथावणीखोर विधान; काँग्रेसची कडक प्रतिक्रिया :
निरहुआ यांनी दिलेल्या वक्तव्यात म्हटलं की, “मी मराठी बोलत नाही. दम असेल तर मला महाराष्ट्रातून काढून दाखवा.” या वक्तव्याने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेने दिलेल्या एका कानफटाटीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना निरहुआ यांनी हे आव्हान केलं होतं. (Raj Thackeray Congress Support)
या विधानावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिनेश लाल यादव हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भरोशावर मोठा झालेला कलाकार आहे. भाषेवरून असं आव्हान करणं म्हणजे त्या खासदाराच्या बुध्दीची दिवाळखोरी आहे. तुला महाराष्ट्रात उभं राहून कळेल की तुझी भोजपुरी कुठे आहे.”
Raj Thackeray Congress Support | भाजपवरही निशाणा – “शेलार यांची पंचायत झाली आहे!” :
फक्त निरहुआच नाही, तर वडेट्टीवार यांनी यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही खरमरीत टीका केली. ते म्हणाले, “दोन ठाकरे भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांना पहलगाम आठवतंय. पुलवामा, आरडीएक्स, अतिरेकी यांची पुनरावृत्ती करून जनता किती वेळा मूर्ख बनणार? आज राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे भाजपची भीती स्पष्ट दिसते.”
भाषिक अस्मिता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी :
कालच्या विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोघंही मराठी भाषेसाठी आक्रमक भूमिका घेतली. “मुंबईत येऊन दादागिरी करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. यावरून भाषिक राजकारण पुन्हा एकदा तापलं असून त्यात उत्तर भारतीय – मराठी या जुन्या वादालाही पुन्हा चालना मिळाल्याचं स्पष्ट होत आहे. (Raj Thackeray Congress Support)
काँग्रेसने राज ठाकरेच्या समर्थनार्थ जाहीर वक्तव्य करणं म्हणजे भविष्यातील संभाव्य राजकीय समीकरणांचं सूचक पाऊल असं अनेक राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. विशेषतः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील संबंध आता अधिक गहिरे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.