Raigad | रायगड (Raigad) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये निर्माण झालेला पेच अजूनही सुटलेला नाही. रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची आणि नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची घोषणा करण्यात आली होती.
मात्र, या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी महायुतीला थेट इशारा देत ‘शेवटची लढाई लढायची वेळ आली तरी चालेल’ असं म्हटलं आहे.
पालकमंत्रीपदावरून शिवसेनेचा वाढता आक्रमक पवित्रा-
शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, रायगडकरांच्या (Raigad) अपेक्षा शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) यांच्याकडून आहेत. तटकरे यांना पालकमंत्री जाहीर केल्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णयावर स्थगिती दिली, ही बाबच त्यांचा विरोध दर्शवते. आता १ मे रोजी आदिती तटकरे रायगडात ध्वजारोहण करणार असल्याने आम्ही त्याला विरोध करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘भरत गोगावले यांनी आतापर्यंत मोठा त्याग केला आहे. मंत्री असूनही त्यांनी गडाला वेळ दिला. त्यामुळे त्यांना पालकमंत्रीपद मिळणं ही रायगडवासियांचीच मागणी आहे,’ असं ते म्हणाले.
रायगडकरांचा असंतोष आणि उठावाचा इशारा-
दळवी यांनी अधिक स्पष्ट करत म्हटलं की, ‘तटकरे कुटुंबीयांचा संपूर्ण रायगडमधून विरोध होत आहे. आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळाली आहे आणि त्यामुळेच आम्ही आशावादी आहोत.’ त्यांनी असेही नमूद केले की, ‘रायगडने जो जनाधार दिला, तो शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे भरत गोगावले यांना पालकमंत्री करावं लागेल.
जर हे न मानल्यास शेवटची लढाई लढण्याची वेळ आली तरी आम्ही तयार आहोत.’ तटकरे कुटुंबाचा उल्लेख करत ते म्हणाले की, ‘सगळं काही आम्हालाच मिळावं हीच त्यांची भूमिका असते. पण यावेळी रायगड उठणारच.’ रायगड हा इतिहासात उठाव करणारा जिल्हा असल्यामुळे यंदा देखील असाच उठाव होईल, असा थेट इशाराच त्यांनी दिला.