Aurangzeb Tomb Remove l छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हिंदुत्ववादी संघटनांसह शिवप्रेमींनी याबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनीही ही मागणी केली आहे. “औरंगजेब राष्ट्रपुरुष होता काय?” असा परखड सवाल उपस्थित करत, त्यामुळे त्याची कबर हटवण्यात यावी, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे.
औरंगजेब समाजसेवक नव्हता, त्याची कबर काढून टाका – लंके :
खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले की, औरंगजेब हा समाजसेवक नव्हता, त्यामुळे कबरला कोणतेही सामाजिक स्वरूप देता कामा नये. “या विषयाला धार्मिक वळण न देता, थडगे हटवले जावे,” असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी यापूर्वीच ही मागणी केली होती, मात्र आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारानेही हेच मत मांडल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यापासून अहिल्यानगरमधील सुपा एमआयडीसी परिसरात व्यावसायिकांना त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप निलेश लंके यांनी केला आहे. “महसूल मंत्री असताना, राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांमार्फत व्यावसायिकांवर दडपशाही केली. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही चुकीच्या पद्धतीने काही कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.
Aurangzeb Tomb Remove l विखे-लंके संघर्ष चिघळतोय? :
विखे कुटुंबीय सातत्याने आमच्यावर गुंडगिरीचे आरोप करतात, मात्र ही “चोराच्या उलट्या बोंबा” असल्याचा आरोप लंके यांनी केला आहे. “सुपा एमआयडीसीत उद्योगांची मोठी वाढ झाली आहे, पण तुम्ही तुमच्या भागात एकही उद्योग आणू शकला नाही. जर आम्ही गुंडगिरी करत असू, तर तुम्ही वेळ आणि ठिकाण सांगा, दोन हात करायला आम्ही तयार आहोत,” असे थेट आव्हानच त्यांनी विखेंना दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निलेश लंके यांनी शिवनेरी गडाच्या स्वच्छतेचा संकल्प केला आहे. “महाराष्ट्रात जन्मलो, तर या भूमीच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करायला हवे,” असे ते म्हणाले. 16 मार्च रोजी शिवनेरी गडावरून या मोहिमेला प्रारंभ केला जाणार आहे. यानंतर प्रत्येक रविवारी किल्ल्यांची स्वच्छता केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यात कमी पडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.