Dhananjay Munde | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडचे पालकमंत्रिपद कुणाकडे असणार याबद्दल बरीच चर्चा रंगली होती. पण, अखेरीस धनंजय मुंडे यांचा पालकमंत्रिपदाच्या यादीतून नाव वगळण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असणार आहे. या कार्यक्रमातून धनंजय मुंडे यांनी पहाटेचा शपथविधीवर बोलताना अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
पहाटेचा शपथविधी घेण्यापूर्वी अजित पवारांना पक्षातून बाहेर काढण्याचं षडयंत्र सुरू होतं, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला आहे. पहाटेचा शपथविधी घ्यायला अजित पवारांनी जाऊ नये, अशी मी हात जोडून विनंती केली होती. पण अजित पवार तसेच गेले आणि त्यांनी शपथविधी घेतला, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे.
“सुनील तटकरे साक्षीदार”
या सगळ्या घटनेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साक्षीदार असल्याचं देखील धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटलं आहे. मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांना पक्षातून काढण्यासाठी कोण षडयंत्र रचत होतं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलंय.
बीड जिल्ह्यात आमचे सरपंच देशमुख यांची निर्घुण हत्या झाली. त्याचे समर्थन कोणीच करु शकत नाही. ज्यांनी केलं त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. त्या 5-8 गुन्हेगारांमुळे मिडिया ट्रायल होत आहे. बीडचा बिहार झाला म्हणत आहेत कोणी केला? 12 ज्योतिर्लिंगेपैकी परळी एक आहे. पण, एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जातंय, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.
“आम्ही तुमच्यासाठी शत्रूंना…”
आम्ही हात जोडून विनंती केली. माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्यामागे उभा राहिला. माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करु शकत नाही. जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेण्यात मागे हटलो नाही. टीका करायचीच ठरलं तर माझ्यासारखा टीकाकार कोणी होऊ शकत नाही. आपल्याला नव संकल्प करायचा असेल तर कार्यकर्त्यावर तेवढा विश्वास ठेवला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.