Dhananjay Munde | अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिर्डीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे. कालपासून या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच हे अधिवेशन भरवलं आहे. पहिल्या दिवशी धनंजय मुंडे या अधिवेशनाला गैरहजर होते. आज दुसऱ्या दिवशी त्यांनी अधिवेशनाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावर मोठं भाष्य केलं आहे.
बीड जिल्ह्यात आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. त्याचे समर्थन कोणीच करु शकत नाही. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. पाच ते आठ गुन्हेगारांमुळे मिडिया ट्रायल होत आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
धनंजय मुंडेंची मागणी
बीडचा बिहार झाला, कोणी केला? 12 ज्योतिर्लिंगेपैकी परळी एक आहे पण एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जात आहे. असे करु नका, ही माझी हात जोडून विनंती असल्याचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडचे पालकमंत्रिपद कुणाकडे असणार याबद्दल बरीच चर्चा रंगली होती. पण, अखेरीस धनंजय मुंडे यांचा पालकमंत्रिपदाच्या यादीतून नाव वगळण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असणार आहे. धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून अजितदादांचं अभिनंदन केलं आहे. पण, आपल्यालाच बीडचे पालकमंत्रिपद नको होतं, असा खुलासाच धनंजय मुंडेंनी केला आहे.
“मी स्वतः विनंती केली होती”
महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्यात आल्यामुळे विरोधकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो, असा दावा धनंजय मुंडेंनी केलं.