Maharashtra l महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबाचे समर्थन करणारे वक्तव्य केल्याने त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या मुद्द्यावरून आजही सभागृहात राजकीय वातावरण तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सिलेक्टिव्ह निषेधाच्या मुद्यावर विरोधकांना लक्ष्य करत त्यांना कोंडीत पकडले.
“सिलेक्टिव्ह निषेध चालणार नाही” – फडणवीसांचा विरोधकांना इशारा :
सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “अबू आझमींना 100 टक्के जेलमध्ये टाकू. मात्र, विरोधकांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या वक्तव्याचा कधी निषेध केला का? आव्हाड म्हणतात की, औरंगजेब होता, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. पण यावर कोणीच काही बोलत नाही.”
तसेच, त्यांनी विरोधकांना फटकारत सांगितले, “सिलेक्टिव्ह निषेध करणे योग्य नाही. तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी (Pandit Jawaharlal Nehru) ‘Discovery of India’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले, त्याचा निषेध करण्याची तुमच्यात हिम्मत आहे का? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेणार नाही,” असे त्यांनी ठणकावले.
Maharashtra l “औरंगजेबची कबर उखडून बाहेर फेका” – नवनीत राणा यांची मागणी :
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करत, औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले, “सरकारने अबू आझमींना सभागृहातून बाहेर काढण्याचे योग्य पाऊल उचलले आहे. मात्र, सरकारने आणखी एक पाऊल उचलून छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर उखडून महाराष्ट्राच्या बाहेर फेकली पाहिजे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात बोलत असताना जोरदार गोंधळ झाला. त्यामुळे विधान परिषदेचे सभापतींनी सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब केले. महायुती आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये जोरदार चकमक पाहायला मिळाली.