Himanshi Narwal | ज्यांचं नुकतंच लग्न झालं होतं, अशा नौदलातील (Indian Navy) अधिकारी विनय नरवाल यांचा काश्मीरमधील (Kashmir) दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी हिमांशी यांच्या समोरच ही हृदयद्रावक घटना घडली. अवघ्या काही दिवसांत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या या वेदनादायक घटनांनी संपूर्ण देश हळहळला आहे.
उद्ध्वस्त झालं नवविवाहित आयुष्य-
१६ एप्रिल रोजी हिमांशी (Himanshi Narwal) आणि विनय नरवाल यांचा विवाह झाला. तीन दिवसांनी म्हणजे १९ एप्रिलला रिसेप्शन पार पडलं आणि २१ एप्रिलला दोघं मधुचंद्रासाठी काश्मीरला रवाना झाले. मात्र २३ एप्रिलला करनाल येथे विनय नरवाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
हे सर्व अवघ्या आठवड्याभरात घडलं. पहलगाम येथे एका अनपेक्षित दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल यांचा बळी गेला. त्यांच्या पत्नीसमोरच ही क्रूर घटना घडली. त्या दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याची स्वप्नं पाहिली होती, ती एका क्षणात उद्ध्वस्त झाली.
या हल्ल्याबाबत हिमांशी यांनी आपला अनुभव मिडियासमोर मांडला. त्या म्हणाल्या, “मी आणि विनय भेळ खात होतो, तेव्हा एक व्यक्ती पुढे आला आणि विचारलं, ‘विनय मुस्लिम आहे का?’ विनयने ‘नाही’ असं उत्तर दिल्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या.”
त्यांच्या या हृदयद्रावक कथनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अंत्यसंस्काराच्या वेळी हिमांशी (Himanshi Narwal) म्हणाल्या, “लग्न झालं, मधुचंद्राला आलो आणि आता विनयच्या अंत्यसंस्कारासाठी उभं राहावं लागलं आहे. सहा दिवसांत सगळं घडलं.”
विनय नरवाल यांचा सेवाभिमानी प्रवास-
विनय नरवाल हे नौदलात लेफ्टनंट पदावर कार्यरत होते. त्यांनी लग्नासाठी ४० दिवसांची रजा घेतली होती. ४ एप्रिलला साखरपुडा झाला आणि १६ एप्रिलला विवाहसोहळा पार पडला. २१ एप्रिलला ते दोघं काश्मीरला गेले होते. विनयचा वाढदिवस १ मे रोजी होता, पण त्याआधीच त्यांच्या आयुष्याची कहाणी संपली.
त्यांच्या आजोबांनी सांगितलं की, विनयला बालपणापासूनच सैन्यात जाण्याची इच्छा होती आणि तीन वर्षांपूर्वी त्याने नौदलात प्रवेश केला होता. वडील राजेश कुमार हे पानिपत (Panipat) येथील कस्टम विभागात कार्यरत आहेत आणि आई गृहिणी आहे. बहीण सृष्टी सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी करत आहे.
हिमांशीचे वडील सुनील कुमार यांनी भावुकतेने सांगितलं की, “लग्नात तिला हिरवा चुडा घातलेला पाहिला आणि आता अश्रूंमध्ये बुडालेली माझी मुलगी पाहतोय. काय बोलावं, सुचत नाही.” विनयची बहीण सृष्टीनेही रडताना विचारलं, “माझ्या भावाची काय चूक होती?” करनाल येथे अंत्यसंस्कारावेळी “विनय नरवाल अमर रहे”, “पाकिस्तान मुर्दाबाद”, “भारत माता की जय” अशा घोषणा दिल्या गेल्या.
त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, विनय आणि हिमांशी स्वित्झर्लंडला (Switzerland) जाण्याच्या विचारात होते, पण नौदलाकडून परवानगी न मिळाल्याने त्यांनी काश्मीरला जाणं पसंत केलं होतं. या दुःखद घटनेने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचं सावट पसरलं आहे.