Indian Railway Hike | भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जुलै 2025 पासून देशभरातील रेल्वे तिकिटांचे दर वाढणार आहेत. ही दरवाढ सर्वसामान्य प्रवाशांपासून ते एसी प्रवाशांपर्यंत लागू होणार असून, यामुळे नियमित प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी देशातील सर्व झोनना यासंदर्भात सर्क्युलर पाठवले असून ही दरवाढ 1 जुलैपासून अंमलात येईल. दरवाढ ही टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असून, वेगवेगळ्या श्रेणींमध्ये त्याचे प्रमाणही वेगळे असणार आहे.
कोणत्या प्रवासासाठी किती दरवाढ? :
नॉन-एसी मेल आणि एक्स्प्रेस गाड्या: प्रति किलोमीटर 1 पैसा दरवाढ.
एसी क्लास (AC Classes): प्रति किलोमीटर 2 पैसे दरवाढ.
सामान्य द्वितीय श्रेणी (General Class): 500 किलोमीटरपर्यंत कोणतीही दरवाढ नाही, पण त्याहून अधिक अंतरासाठी प्रति किलोमीटर अर्धा पैसा दरवाढ.
दरवाढीचा सर्वाधिक फटका लांब पल्ल्याच्या प्रवाशांना बसणार आहे. विशेषतः एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांचे तिकीट थेट वाढणार असून, मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवाशांनाही याचा परिणाम भोगावा लागणार आहे.
Indian Railway Hike | मासिक पासधारकांसाठी दिलासा :
दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या शहरी प्रवाशांसाठी सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मासिक सीझन तिकीट (MST) किंवा मासिक पासच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑफिसला रेल्वेने जाणारे लाखो प्रवासी या दरवाढीपासून वाचले आहेत.
तसेच, लोकल आणि सबर्बन ट्रेन्सच्या तिकीट दरातही कोणताही बदल नाही. ही दरवाढ मुख्यतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी लागू केली जाणार आहे.
तत्काळ बुकिंगसाठी नवे नियम :
रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगबाबतही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता 1 जुलै 2025 पासून तत्काळ तिकीट बुक करताना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. याचबरोबर 15 जुलैपासून OTP व्हेरिफिकेशनही आवश्यक असेल.
IRCTC च्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे तत्काळ तिकिट बुक करताना फक्त आधार लिंक असलेले युजरच तिकिट बुक करू शकतील.
OTP द्वारे तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित बनवण्यात येणार असून, तिकीट दलालांच्या मनमानीला आळा बसवणे हे यामागचे मुख्य कारण आहे.