Kolhapur News | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भयंकर गुन्हे समोर येत आहेत. कधी प्रेमविवाह केला म्हणून हत्या तर कधी रस्त्यावर गाडीचा धक्का लागला म्हणून थेट हाणामारी, जीवघेणे वार अशा प्रकारांमुळे राज्यात कायद्याची, पोलीस प्रशासनाची भीती राहिली की नाही?, असा सवाल उपस्थित केला जातोय. अशात कोल्हापूरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. (Kolhapur News)
कोल्हापूरमध्ये प्रेम करुन लग्न करण्याची मोठी शिक्षा लग्न मंडपात उभ्या असलेल्या एका मुलीच्या कुटुंबाबरोबरच लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना भोगावी लागली असती पण सुदैवाने सर्व प्रकार त्वरित उघडकीस आला. सारा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणामधील मुख्य आरोपी हा नवरीचा मामा असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
नेमकं काय घडलं?
झालं असं की, कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावामध्ये भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये संपूर्ण गावाने हजेरी लावली होती. मात्र, या कार्यक्रमात करण्यात आलेल्या जेवणात चक्क विषारी औषध टाकल्याची घटना समोर आली आणि या संपूर्ण प्रकाराने अख्ख गाव हादरलं. गावात एकच खळबळ उडाली. (Kolhapur News)
महेश जोतीराम पाटील असं या आरोपी मामाचं नाव आहे. आरोपीने आपल्या भाचीच्या लग्नाच्या जेवणात विष टाकलं. त्याने हे कृत्य का केलं?, त्याचा देखील खुलासा झाला आहे. महेश या आरोपीचा भाचीच्या लग्नाला विरोध होता. आपल्या भाचीने आपल्या मर्जी विरोधात लग्न केल्याने मामाच्या मनात प्रचंड राग होता.आठवड्यापूर्वीच भाचीने गावातीलच मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याने बदनामीच्या रागातून आरोपी मामा महेश याने हे कृत्य केलं.
…म्हणून मामाने जेवणात टाकलं विष
पळून जाऊन लग्न केलेल्या या मुलीच्या घरच्यांनी तिच्या लग्नाचा स्वीकार केला आणि भव्य रिसेप्शनचे आयोजन केले.घरच्यांनी गावकऱ्यांसाठी भोजन समारंभाचं आयोजन केलं होतं. मात्र या भोजन समारंभामधील जेवणात मुलीवरील राग काढण्यासाठी मुलीच्या मामाने चक्क जेवणात विषारी औषध टाकलं. (Kolhapur News)
लग्नाच्या रिसेप्शननिमित्त आयोजित समारंभातील जेवणात विषारी औषध टाकताना मामा महेशला आचाऱ्याने पाहिल्याने सर्व प्रकार उघड झाला.त्यानंतर महेशने तिथून पळ काढला असून तो फरार आहे. आचाऱ्याने वेळीच हा सर्व प्रकार पाहिल्याने मोठी घटना टळली. याची सध्या राज्यभर चर्चा रंगली आहे.