11th Admission | राज्यभरातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये (11th Admission Fee) यावर्षीपासून मोठे बदल करण्यात आले आहेत. आता ही संपूर्ण प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे राबवली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, यासाठी लागणाऱ्या नोंदणी शुल्कातही कपात करण्यात आली असून, यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. याआधी मुंबई विभागासाठी 225 रुपये आणि उर्वरित विभागांसाठी 125 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता राज्यभरासाठी फक्त 100 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. (11th Admission Process)
शालेय शिक्षण विभागाने यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in सुरू केले आहे. 15 मेपर्यंत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपली नोंदणी पूर्ण करून प्रमाणीकरण करावं लागणार आहे. तर विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया 19 मेपासून सुरू होणार असून, त्यावेळी प्राधान्यक्रमही भरता येणार आहे. दहावीचा निकाल 15 मेपूर्वी लागण्याची शक्यता असल्यामुळे वेळापत्रक योग्य प्रकारे राबवता येईल.
15 ऑगस्टपूर्वी प्रवेश पूर्ण करण्याचे उद्दिष्ट :
या नव्या ऑनलाइन प्रणालीअंतर्गत राज्यातील जवळपास 11,700 कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे 16.76 लाख जागांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. दरवर्षी दीर्घकाळ चालणारी ही प्रक्रिया यंदा 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाविद्यालयांचे वर्ग 11 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. (11th Admission Process)
दुसरीकडे, मुंबई विद्यापीठाने काही महाविद्यालयांवर कठोर पावले उचलली आहेत. नॅक मूल्यांकन, एनबीए पूर्तता व सीडीसी समितीच्या स्थापनेअभावी विद्यापीठाशी संलग्न 229 महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. या महाविद्यालयांवर 10 हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला असून, त्यांची यादी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
11th Admission | 12वी पुरवणी परीक्षा अर्ज प्रक्रिया सुरू :
महाराष्ट्र राज्य मंडळ जून-जुलैमध्ये 12वीची पुरवणी परीक्षा घेणार आहे. त्यासाठी 7 ते 17 मे दरम्यान नियमित शुल्कासह आणि 18 ते 22 मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.