Maharashtra Weather l राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो (Heatwave yellow alert) अलर्टचा इशारा दिला आहे. उन्हाच्या तीव्रतेने नागरिकांची दैना उडाली असून, घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाडा, कोकणात यलो अलर्ट; उष्ण व दमट हवामानाची शक्यता :
विदर्भात उष्णतेचा प्रकोप अधिक जाणवत असून, चंद्रपूरमध्ये तब्बल ४५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. अकोला, अमरावती, नागपूर आणि ब्रह्मपुरी याठिकाणीही तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. यामुळे या भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवणार असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. (Maharashtra Weather)
हवामान खात्याने कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसह, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच सोलापूर शहरातही उष्णतेचा प्रकोप अधिक असून, तापमान ४३ अंशांवर पोहोचले आहे.
Maharashtra Weather l गव्हाच्या उत्पादनावर परिणाम; बाजारात आवक घटली :
उष्णतेच्या वाढत्या प्रमाणामुळे शेतीच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. यंदा थंडी कमी पडल्याने गव्हाची वाढ नीट झाली नाही. त्यामुळे हलक्या प्रतीचा गहू मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. यामुळे गव्हाला कीड लागू शकण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये गव्हाची आवक १५ मार्चपासूनच सुरू झाली असून, सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून गहू येत आहे. (Maharashtra Weather)
राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा अधिक असून, उन्हाचा तडाखा (Maharashtra Heatwave) वाढतच चालला आहे. नागरिकांनी भर दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, पाणी भरपूर प्यावे आणि उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.