Maharashtra Heatwave | महाराष्ट्रभरात उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये अशक्तपणा, चक्कर येणे आणि डिहायड्रेशनसारख्या आरोग्य समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम दैनंदिन जीवनावर होत असून, आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात उष्माघाताचे रुग्णही नोंदवले जात आहेत.
उन्हाच्या तडाख्याची लक्षणे आणि परिणाम-
सध्या अनेक नागरिकांना तीव्र उन्हामुळे अशक्तपणा (Maharashtra Heatwave) जाणवत आहे. यासोबतच, डोकेदुखी, चक्कर येणे, वारंवार घसा कोरडा पडणे आणि रक्तदाब कमी होणे यांसारख्या तक्रारी वाढत आहेत. बाहेर पडल्यास किंवा उन्हात काम केल्यास हा त्रास अधिक जाणवत असल्याचे डॉक्टरांनी नोंदवले आहे.
अनेकांना डिहायड्रेशनमुळे मळमळ होणे, उलट्या होणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे यांसारखी गंभीर लक्षणेही दिसत आहेत. शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक, गर्भवती आणि स्तनदा माता तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींना उन्हाचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे दिसून येते.
उष्माघात आकडेवारी आणि वैद्यकीय सल्ला-
आरोग्य विभागाच्या (Maharashtra Heatwave) अहवालानुसार, राज्यात १ मार्च ते १ मे या दोन महिन्यांच्या कालावधीत उष्माघाताच्या १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये तीन संशयित मृत्यूंचाही समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण विदर्भामध्ये आढळले असून, यवतमाळ (Yavatmal) (१७), बुलढाणा (Buldhana) (१२), नागपूर (Nagpur) (१०), जालना (Jalna) (८) आणि परभणी (Parbhani) (६) या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. पुणे (Pune) जिल्ह्यात अधिकृतपणे उष्माघाताचा एकच रुग्ण नोंदवला गेला असला तरी, उन्हामुळे होणाऱ्या इतर त्रासांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
फिजीशियन डॉ. यश बकुळीकर (Dr. Yash Bakulikar) यांच्या मते, उन्हाळ्यामध्ये ताप, संसर्गजन्य आजार, डायरिया, कावीळ आणि पोटाचे आजार वाढतात. पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा धोकाही असतो. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, आहाराची काळजी घ्यावी आणि गरजेशिवाय उन्हात फिरणे टाळावे. विशेषतः बाहेरील अन्नपदार्थ खाताना आणि पाणी पिताना अधिक खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.