Maharashtra Weather | राज्यातील हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. एकीकडे उष्णतेची लाट काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड तापमानासह जाणवणार असतानाच, दुसरीकडे अनेक भागांमध्ये अचानक पावसाच्या सरी आणि गारपीटीचं आगमन होणार आहे. पुढील चार दिवस हवामानात बदल पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान विभागाने (IMD) दिली आहे. (Maharashtra Weather)
राज्यात उष्णतेचा कहर व गारपिटीचाही धोका
हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार आहे. पण या उष्णतेच्या दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात झपाट्याने बदल होणार असून गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सध्या ओडिशा ते पश्चिम बंगाल दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. हा पट्टा उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेला असून त्यामुळे या भागात वादळी हवामान तयार होण्याची शक्यता आहे.
तसेच दुसरा कमी दाबाचा विभाग मध्य छत्तीसगडपासून मन्नारच्या आखातापर्यंत पसरलेला आहे. हा पट्टा विदर्भसोबतच तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधून जात आहे. त्यामुळे या सर्व प्रदेशात पावसाच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. हवामानातील या अचानक बदलामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची भीती आहे.
शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
राज्यात मागील काही दिवसांपासून हिटवेवचा जोर वाढलेला असताना आता पुन्हा हवामानात बदल होणार आहे. 27 आणि 28 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट अनेक जिल्ह्यांवर कोसळणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा आणि सांगली येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याचवेळी सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होणार आहे.
26 एप्रिलला सातारा, घाटमाथा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज 25 एप्रिल रोजी मात्र या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट जाणवणार आहे.
Title : Maharashtra Weather Rain and Hail Alert in 9 Districts