Maratha Reservation l गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. मात्र, यापूर्वी दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी मराठा समाजाकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली गावात एका 26 वर्षीय युवकाने आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाचे टोकाचे पाऊल :
धाराशिव जिल्ह्यातील देवळाली गावातील योगेश संजय लोमटे (वय 26) या तरुणाने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, योगेश गेल्या काही वर्षांपासून नोकरीच्या शोधात होता, मात्र मराठा समाजास आरक्षण नसल्याने त्याला नोकरी मिळत नव्हती. या सततच्या अपयशामुळे तो नैराश्यात गेला आणि अखेर टोकाचे पाऊल उचलले.
योगेशच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात त्याने मराठा आरक्षण मिळत नसल्याने जीवन संपवत आहे असे स्पष्ट लिहिले आहे. हा प्रकार उघड होताच गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला आहे.
Maratha Reservation l मनोज जरांगे यांची भूमिका आणखी आक्रमक :
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील सातत्याने युवकांना टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन करत आहेत. मात्र तरीही युवकांच्या आत्महत्या थांबत नाहीत. मागील आठवड्यातच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत दिले होते. त्यांनी “आता कमी बोलायचे आणि करून दाखवायचे” असे वक्तव्य केले होते. या घटनेनंतर मराठा समाजाचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे आता मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी होत आहे. मात्र, यावर कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने अनेक तरुण मानसिक तणावात जात आहेत.