MNS-ShivSena Alliance | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं भाऊ एकत्र येण्याच्या दिशेने सकारात्मक पावलं उचलत असतानाच, त्यांच्या भोवती असलेल्या जुन्या गोटांमधून निर्माण होणारा विरोध आता चर्चेचा विषय बनला आहे. राजकीय वर्तुळात देखील या युतीबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. (MNS-ShivSena Alliance)
एकत्र येण्यासाठी दोघांचं पाऊल पुढं
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक वर्षांपासून एक फँटसी वाटणारी बाब म्हणजे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं एकत्र येणं. सध्या ही शक्यता अधिक वास्तव वाटत आहे. एकेकाळी शिवसेनेच्या (Shivsena Thackeray Camp) दोन्ही गटांमध्ये फूट पडल्यानंतर एकमेकांपासून दूर गेलेले ठाकरे बंधू आता पुन्हा एकत्र येण्याच्या प्रयत्नात असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
राज ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या पॉडकास्टमधून मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्यातले भांडण बाजूला ठेवण्याचं आवाहन केलं. त्याला उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला भाजप व शिंदे गटाशी असलेली तडजोड नको, अशी अट घालून प्रतिसाद दिला होता. मात्र नंतर ठाकरे गटाने कोणतीही अट न ठेवता एकत्र येण्यास तयार असल्याचं स्पष्ट करत दुसरं पाऊल पुढे टाकलं.
मनसेतून सूर मात्र नेगेटिव्हच?
राज आणि उद्धव यांच्यातील संभाव्य एकत्र येणं पाहता मनसेच्या (MNS) काही नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहेत. संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत, त्यांनी भाजपला धोका दिला, आता पवारांनाही देतील, असा सवाल उपस्थित केला. शिवाय, मुख्यमंत्री असताना मनसेच्या मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनात कार्यकर्त्यांवर १७ हजार गुन्हे दाखल केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावत, “महाराष्ट्रद्रोही कोण हे त्यांना कळत नसेल, तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग घ्यावा लागेल,” असं म्हटलं. या पार्श्वभूमीवर हे स्पष्ट दिसतं की, दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांच्या गोटातील दुसऱ्या फळीतील नेत्यांमधील जुना रोष अजूनही कायम आहे.
राजकीय फटका भाजपला?
या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी मतांचं ध्रुवीकरण झाल्यास भाजपच्या जागांवर परिणाम होऊ शकतो. (MNS-ShivSena Alliance)
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. “राज आणि उद्धव एकत्र आले, तर आम्ही स्वागत करू. कुणीही मतभेद विसरून एकत्र येत असेल, तर त्यात काहीच वाईट नाही. मात्र सध्या या केवळ चर्चा आहेत, घाई करू नका, थोडी वाट पाहा,” असं ते म्हणाले.
Title : MNS-ShivSena Alliance Talks Hit Internal Resistance