Road Accidents l महाराष्ट्रामध्ये गेल्या नऊ वर्षांत रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून, हि बाब अत्यंत चिंताजनक आहे. २०१६ ते २०२४ या काळात झालेल्या अपघातांमध्ये तब्बल १,२२,२७० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती अधिकारातून समोर आली आहे. याशिवाय, २,५८,७२३ लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी, अपघातांची संख्या कमी होताना दिसत नाही.
मुंबईत सर्वाधिक अपघात :
राज्यात सर्वाधिक अपघात मुंबईमध्ये (Mumbai) झाले आहेत. मुंबईत झालेल्या २३,५१९ अपघातांमध्ये ३,८०२ लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातांच्या संख्येत मुंबईनंतर पुणे (Pune) शहराचा क्रमांक लागतो. धक्कादायक बाब म्हणजे, पुणे शहरात अपघाती मृत्यूंची संख्या (८,३९९) राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे.
अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिस (Traffic Police) आणि आरटीओ (RTO) यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. मात्र, अनेकदा रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने यांसारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे अपघात घडतात. अनेक वाहनचालक रस्त्यांवरील या समस्यांकडे लक्ष वेधतात.
Road Accidents l सोलापूर शहरात सर्वात कमी अपघात :
सर्वाधिक अपघात मुंबईत झाले असले, तरी सर्वात कमी अपघातांची नोंद सोलापूर (Solapur) शहरात झाली आहे. सोलापूर शहरात गेल्या नऊ वर्षांत केवळ १,९२५ अपघात झाले, ज्यात ६९४ लोकांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात १,९८२ अपघात झाले असून, त्यात ६५२ जणांचा बळी गेला आहे.
एकूण आकडेवारी पाहता, राज्यात नऊ वर्षांत ३,०३,५३१ अपघात झाले. या अपघातांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक जखमी झाले, तर काहींना कायमचे अपंगत्व आले. प्रशासनाने रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.