Pune News : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा “पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार” (Journalist Varunraj Bhide Award) प्रदान सोहळा नुकताच पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात (S.M. Joshi Auditorium) उत्साहात संपन्न झाला. वरुणराज भिडे परिवार ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमात माध्यम क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.
या सोहळ्यात दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार श्री. यदु जोशी (Yadu Joshi) यांना पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे श्री. प्रशांत आहेर (Prashant Aher) यांना आश्वासक पुरस्कार, दैनिक लोकसत्ताचे श्री. दिगंबर शिंदे (Digambar Shinde) यांना ग्रामीण पत्रकारितेसाठी आणि एबीपी माझाचे पुणे प्रतिनिधी श्री. मिकी घई (Micky Ghai) यांना टीव्ही मीडियातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. तसेच, प्रतिष्ठेच्या रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित पत्रकार श्री. मंदार गोंजारी (Mandar Gonjari) यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नेते श्री. उल्हास पवार(Ulhas Pawar), राष्ट्रवादी काँग्रेस नेते श्री. अंकुश काकडे (Ankush Kakde), अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. राजू परुळेकर (Raju Parulekar) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या मान्यवरांसह श्री. सतीश देसाई, श्री. शिशिर जोशी, श्री. सुदर्शन पाठक आणि इतर प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
पत्रकारांनी लेखणी मजबूत ठेवावी – राजू परुळेकर
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी लोकशाहीचे चार स्तंभ – विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि पत्रकारिता – यांच्यातील मतभेद टाळण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर टीका केली. ते म्हणाले, “लोकशाहीच्या या स्तंभांनी एकमेकांवर खुलेपणाने टीका करायला हवी. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मैत्री असली तरी पत्रकारांचे स्थान वरचे असले पाहिजे. आजच्या काळात लेखणी मजबूत ठेवणे आवश्यक आहे.”
बातमी लिहिण्याचे स्वातंत्र्य कमी होत आहे – डॉ. अमोल कोल्हे
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सध्याच्या काळात पत्रकारांना बातमी लिहिण्याचे स्वातंत्र्य मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “वरिष्ठांचा दबाव किंवा राजकीय विचारांचा प्रभाव यामुळे सत्य मांडणे अवघड झाले आहे. महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारले जात आहेत. समाजमन ढवळून काढणारे विषय संपल्यामुळे अनावश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात आहे. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आता पत्रकार, कलावंत आणि विचारवंतांवर आहे.”