Raigad News | रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना मोठा तडका देणारी घडामोड आज घडली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारणाला आज मोठा धक्का बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) माजी आमदार आणि सरचिटणीस जयंत पाटील (Jayant Patil) यांचे बंधू पंडित पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवेशामुळे रायगडमधील शेकापच्या मुळांवर घाव बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंडित पाटील म्हणाले…
पंडित पाटील यांनी भाजपात (BJP) प्रवेश करताना दावा केला की, “या प्रवेशामुळे रायगड (Raigad News) जिल्ह्यात भाजपची ताकद लक्षणीय वाढणार असून पक्ष क्रमांक एकच्या स्थानावर येईल.” पाटील यांचा रायगड जिल्ह्यात ठाम जनसपर्क असल्याने, भाजपसाठी हे खूपच फायदेशीर ठरू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत आपली ताकद दाखवून देणार असल्याचा इशारा त्यांनी अप्रत्यक्षपणे जयंत पाटील यांना दिला आहे.
रायगडमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता-
भाजप प्रदेश कार्यालयात आज(16 एप्रिल) सकाळी 11 वाजता पक्ष प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यामुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रायगडच्या दुसऱ्या टोकावरही मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शरद पवार गटाचे श्रीवर्धन मतदार संघातील उमेदवार आणि माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आशिष जैस्वाल आणि अन्य नेतेही उपस्थित होते.
निवडणुकांमध्ये भाजपचा दबदबा अधिक वाढण्यार?
राज्यात भाजप आणि महायुतीच्या वाढत्या प्रभावामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांतील अनेक स्थानिक नेते सत्ताधारी पक्षाकडे वळत आहेत. कोल्हापूर, अहमदनगर, ठाणे आणि सातारा जिल्ह्यांतूनही भाजपात मोठ्या प्रमाणात नेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा दबदबा अधिक वाढण्याचे संकेत आहेत. रायगडमधील ही घटना त्याचेच संकेत देणारी ठरत आहे.