Raj Thackeray | राज्यात नव्याने उफाळून आलेल्या त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. गुरुवारी (26 जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आणि याविरोधात 6 जुलै रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्याची घोषणा केली.
राज ठाकरेंनी स्पष्ट केले की, हा मोर्चा पूर्णतः अराजकीय असणार असून कोणताही पक्षाचा झेंडा वापरण्यात येणार नाही. मोर्चाचा एकमेव अजेंडा ‘मराठी’ असेल. या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणसाकडूनच होईल आणि तो संपूर्णपणे मराठी अस्मितेसाठी असेल, असे ते म्हणाले.
दादा भुसे यांची भेट आणि राज ठाकरेंची प्रतिक्रिया :
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्रिभाषा धोरणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र राज ठाकरे यांनी ती भूमिका फेटाळून लावत, ती ‘मान्य नसल्याचे’ जाहीर केले. त्यांच्या मते, सीबीएससी शाळांद्वारे राज्यातील शाळांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो महाराष्ट्राच्या हिताचा नाही.
राज ठाकरे म्हणाले, “राष्ट्रीय शिक्षण धोरणात अशी सक्तीचा कुठेही उल्लेख नाही. केंद्राने राज्यांवर जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने असा निर्णय का घ्यावा? यावर दादा भुसे यांच्याकडे उत्तर नव्हते.” त्यामुळेच आम्ही या धोरणाचा विरोध करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Raj Thackeray | 6 जुलैचा मोर्चा फक्त मराठीसाठी :
राज ठाकरे यांनी आवाहन केले की, हा मोर्चा 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून निघणार आहे. यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ आणि सर्वसामान्य मराठी माणसांचा सहभाग अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, रविवार असल्याने जास्तीत जास्त लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ही तारीख निवडण्यात आली आहे. (Raj Thackeray)
राज ठाकरेंनी हेरकले की, “हा फक्त भाषेचा मुद्दा नाही, तर महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेवर चाललेला कट आहे. हा कट उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र यावे आणि सरकारला दाखवून द्यावे की महाराष्ट्र अजूनही मराठीपणासाठी लढू शकतो.”