Manoj Jarange | संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या धक्कादायक घटनावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “बदला घेणं, हीच एकच गोष्ट आता आपल्या हातात आहे,” असे रोखठोक विधान त्यांनी केले. (Manoj Jarange)
“बदला घेण्याशिवाय पर्याय नाही” – मनोज जरांगे
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, “संतोष भय्याला देखील आनंद वाटला पाहिजे. जबाबदारी आपली आहे. मी टोकाची भाषा करतोय, कारण एवढ्या क्रूरतेने हत्या करण्याची काहीच गरज नव्हती. वाद, भांडण चालतं, पण इतका तिरस्कार आणि क्रौर्य कशासाठी? त्यांना फक्त पैसा आणि सत्ता हवी, म्हणून कोणत्याही टोकाला जातील.”
या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील थेट संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले. त्यावेळी देशमुख कुटुंबीय अत्यंत भावूक झाले, तर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी घरात जायची देखील हिम्मत होत नसल्याचे सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, “त्यांना जावं लागेल. मी स्वतः कठोर काळजाचा आहे, पण हे फोटो पाहून कोणाचाही आत्मविश्वास डगमगेल. पण आता घरात जावं लागेल, बाहेर यावं लागेल, आणि लढावं लागेल. हा अन्याय थांबवायचा आहे.”
“302 लावा आणि धनंजय मुंडेला जेलमध्ये टाका”
या हत्येच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी होत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. यावरच जरांगे म्हणाले की, “नुसता राजीनामा देऊन काही होणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि त्यांनाही तुरुंगात टाका. नाटकबाजी नको. जनता काय करू शकते हे सरकारला ठाऊक आहे,” असे त्यांनी ठणकावले.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आणि राजकीय हालचालींवर आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Manoj Jarange)
Title : Santosh Deshmukh Murder Manoj Jarange Aggressive Stand