Shivsena UBT l शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) पक्षाला कोकणात मोठा धक्का बसला असून, माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. तसेच, ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सध्या कोकणात ठाकरे गटाकडे केवळ आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) हेच उरले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोकणातील परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
राजन साळवींच्या पाठोपाठ वैभव नाईकही शिंदे गटात? :
राजन साळवी यांच्यावर एसीबी (ACB) चौकशीचा दबाव असल्याने त्यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला. आता वैभव नाईक यांच्यावरही एसीबी चौकशीचा ससेमिरा असल्याने त्यांचा पुढचा निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतीच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंची भेट घेण्याआधीच त्यांनी ठाकरे गटात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी या संदर्भात मोठा दावा करत सांगितले की, “ठाकरे गटातील अनेक लोक आमच्या पक्षात येणार आहेत. येत्या आठवड्यात कोकणात मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळतील.”
Shivsena UBT l कोकणात मोठ्या घडामोडींची शक्यता :
भरत गोगावले म्हणाले, “ठाकरे गटाने जर आधीच लोकप्रतिनिधींची बैठक घेतली असती, तर ही वेळ आली नसती. पण आता हे घडवून आणण्याचे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले आहे. कारण ते सामान्य जनतेसाठी काम करत आहेत आणि त्यामुळेच लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसत आहे. अनेक लोक अजूनही संपर्कात आहेत आणि लवकरच मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश करतील.”
वैभव नाईक यांचा निर्णय गुप्त? :
वैभव नाईक यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत विचारले असता भरत गोगावले म्हणाले, “त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. मात्र, सगळ्या गोष्टी उघड करून सांगता येत नाहीत. योग्य वेळी सर्व माहिती दिली जाईल. एसीबी चौकशी म्हणजे कोणी दोषी ठरत नाही. चौकशीला सामोरे गेल्यानंतर ते स्वतः योग्य तो निर्णय घेतील.” या सर्व घडामोडींमुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले असून, ठाकरे गटाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.