Swargate Rape Case l स्वारगेट एसटी आगारात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची माहिती पोलिसांनी जाणूनबुजून बाहेर येऊ दिली नाही, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिले आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, “ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही, तर केवळ गुप्तता पाळण्यात आली होती. कारण, जर बातमी लगेच बाहेर आली असती, तर आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) सावध झाला असता आणि फरार झाला असता. त्यामुळे पोलिसांनी ही माहिती काही काळ गुप्त ठेवली.”
“पोलिसांनी दुर्लक्ष केलं नाही” :
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट एसटी आगार आणि स्वारगेट पोलीस ठाण्याला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल. पोलिसांकडून दुर्लक्ष झालं असं म्हणणं चुकीचं आहे. त्या रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत पोलिसांनी गस्त घातली होती. सीसीटीव्ही फूटेजनुसार, रात्री दीड वाजता आणि त्यानंतर तीन वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी येऊन गेले होते.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “दत्तात्रय गाडे याच्यावर याआधीही चोरीसह काही गुन्हे दाखल आहेत. मात्र, पुण्यातील स्थानिक गुन्हेगारांचे रेकॉर्ड पोलिसांकडे असते, पण ग्रामीण भागातून आलेल्या गुन्हेगारांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध नसते. त्यामुळे व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पावलं उचलली जातील.”
Swargate Rape Case l “फेशिअल रेकग्निशन तंत्रज्ञानाने पोलिसांना मदत” :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शहरात सीसीटीव्ही नेटवर्क सुधारण्यासाठी ४३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहितीही योगेश कदम यांनी दिली. “हे सीसीटीव्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानावर आधारित असतील. आरोपींचा चेहरा ओळखून तातडीने सूचना मिळेल, यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसण्यास मदत होईल,” असे ते म्हणाले.
या घटनेत एक धक्कादायक बाब म्हणजे अत्याचाराच्या वेळी बसच्या आसपास १० ते १५ लोक उपस्थित होते. मात्र, “तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना संशयही आला नाही. त्यामुळे आरोपीने गुन्हा केला. मात्र, तो लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल आणि संपूर्ण सत्य बाहेर येईल,” असे स्पष्टीकरण योगेश कदम यांनी दिले.
या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून सरकारवर टीकेची झोड उठली आहे. पोलिसांनी माहिती गुप्त ठेवण्याच्या निर्णयावरूनही चर्चा सुरू झाली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.