Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे 40 वर्ष जुने माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम (Sachin Kadam) यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अचानक राजीनाम्याने ठाकरे गटात खळबळ उडाली असून, या राजकीय घडामोडीने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
सचिन कदम यांनी आपल्या राजीनाम्यास वैयक्तिक कारणं जबाबदार असल्याचं सांगितलं असलं तरी, भास्कर जाधव यांच्यासोबत झालेल्या उघड संघर्षामुळे हा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे. कदम यांच्या राजीनाम्यामुळे रत्नागिरीतील शिवसेना ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालं आहे.
सचिन कदम यांच्या निर्णयाची पार्श्वभूमी
40 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेत कार्यरत असलेले सचिन कदम हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जात होते. अनंत गीते आणि विनायक राऊत यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, भास्कर जाधव यांच्यासोबत सुरू असलेल्या मतभेदांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. कदम यांनी पक्षातील सर्व पदं आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, सध्या कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. विशेषतः, रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र, कदम यांनी माध्यमांशी बोलताना सध्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नसल्याचं सांगितलं आहे. (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
या राजीनाम्यानंतर ठाकरे गटाला बसलेल्या धक्क्याचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर होताना दिसतो. नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याच्या चर्चांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, “मी बाळासाहेबांना वडील आणि पक्षप्रमुख म्हणून ओळखतो. ते ज्या पद्धतीने लढले, तसंच मी लढणार आहे. ही लढाई अर्धवट सोडून जाणारा नाही.”
पुढील राजकीय समीकरणं
सचिन कदम यांचा राजीनामा हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या पुढील राजकीय हालचालींवर रत्नागिरीसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. ठाकरे गटातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत असताना, उद्धव ठाकरेंना पक्षातील गटबाजी आणि नेतृत्व संकटाशी लढावं लागणार आहे. (Uddhav Thackeray)