“रोहित पवारांना अटक झाली तरी मी…”; राजेंद्र पवारांच्या वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rajendra Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर संपूर्ण पवार कुटुंब दोन गटात विभागलं गेलं आहे. कुटुंबातील काही सदस्य हे शरद पवार तर काही अजित पवार गटाला समर्थन देत आहेत. त्यात आमदार रोहित पवार हे शरद पवार गटात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक वार दिसून येतंय. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशात रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार (Rajendra Pawar) देखील या मैदानात उतरले आहेत.

राजेंद्र पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधत बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी रोहित पवारांना जरी अटक झाली तरी आपण शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकारणात सध्या राजेंद्र पवार यांचं वक्तव्य चर्चेत आलंय.

राजेंद्र पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार यांनी धरणातील मुत्राशयाचा उल्लेख केला आणि आमची मान खाली गेली. सकाळचा शपथविधी केला आणि आमची मान खाली गेली. दुपारचा शपथविधी केला तेव्हाही आमची मान खाली गेली. आता रात्रीचा कोणता कार्यक्रम दाखवणार आहेत माहित नाही, अशा शब्दात राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी अजित पवारांवर टीका केलीये.

पुढे त्यांनी अजित पवार यांच्या मिशा काढणार, या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. “मिशा ठेवायच्या की नाही हा त्यांचा विषय आहे. अजित पवारांना कधी घरातून विरोध झाला नाही. ते म्हणतात पावसाळ्यात छत्र्या उगवतात. त्यांना माहीत नाही आम्ही सगळ्या सीझनमध्ये इथेच असतो. अजित पवार यांची दमदाटी करणे हा स्वभाव आहे. ते आवाजाचा दुरुपयोग करतात.”, असं राजेंद्र पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बारामतीमध्ये झालेल्या प्रचारात अजित पवार यांनी मोठं विधान केलं होतं. सध्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानाबाबतच राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली.

News Title – Rajendra Pawar big statement