‘कारण नसताना मला…’; ट्रोलिंगवर अजित पवार स्पष्टच बोलले

पुणे | राज्यात कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून राजकारण तापताना दिसत आहे. या विषयावर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. यावर बोलताना अजित पवारांनी आपली भूमिका मांडली.

कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय मागच्या सरकारच्या काळातलाच असल्याचं अजित पवार म्हणालेत. तसेच यावरून कारण नसताना मला ट्रोल केलं जात आहे, असं अजित पवार म्हणालेत.

हा निर्णय आत्ताचा नाही. तो निर्णय मागच्या सरकारच्या काळातला आहे. त्या काळात कुणाकुणाच्या त्यावर सह्या आहेत हेही मी दाखवायला तयार आहे. आज ते सरकार नाही म्हणून लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचं, आम्हाला बदनाम करायचं काम चालू झालं, असा आरोप अजित पवारांनी केलाय.

काही विभागात काही हजारांत कर्मचारी कमी आहेत. त्यांच्या भरतीची प्रक्रिया सध्या चालू आहे. काही ठिकाणी टाटाला आपण भरती करायला सांगितलं आहे. तीन कंपन्या आपण निवडल्या आहेत. त्याशिवाय एमपीएससीकडून भरती केली जाते. काही ठिकाणी ताबडतोब माणसं लागतात. उदाहरणार्थ 30 हजाराची शिक्षकभरती. मागच्या सरकारच्या काळात काय घडलं आणि कुणाकुणावर कारवाई करण्यात आली हे आपल्यासमोर आहे, असंही अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं.

मलाही कळतं. मीही 32 वर्षांपासून महाराष्ट्रात काम करतोय. तरुण-तरुणींचे काय प्रश्न आहेत, बेरोजगारीचे काय प्रश्न आहेत हे आमच्याही डोळ्यांसमोर आहेत. ते दूर करण्यासाठी आपण दीड लाखांची भरती करत आहोत. काही ठिकाणी तातडीने माणसं लागतात यासाठी तात्पुरत्या स्वरुपात माणसं भरली. कायमस्वरूपी नाही, अशी भूमिका अजित पवारांनी यावेळी मांडली.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More