बीड | राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत आहे. राज्याच्या अनेक भागात साखळी उपोषण सुरु आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव आंदोलन करत आहेत. यामध्ये काही राजकीय पक्षांचे नेते सुद्धा सहभागी झालेले आहेत.
मराठा आंदोलन सुरळीत चालत असताना त्याला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी बीड येथे राजकीय नेत्यांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली, शिवाय त्यांच्या गाड्या तसेच घरे देखील जाळण्यात आली. यामध्ये 17 ते 22 वयोगटातील तरुणांचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाले पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर?
माध्यमांशी बोलत असताना अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, की लोकप्रतिनिधींच्या घरी जाळपोळ झाली, त्यावेळी जमाव हिंसक झाला होता. जमावाकडून महिला अन् लहान मुलांना टार्गेट करण्यात आलं होतं, असा दावा ठाकूरांनी केला आहे. हल्ला करणारे तरुण हे 17 ते 22 वयोगटातील होते, असंही त्यांनी सांगितलं आहे.
याशिवाय, जीव मारण्याचा आंदोलकांचा उद्देश असल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणात संपूर्ण बीड जिल्ह्यात 300 जणांची चौकशी केली आहे. आतापर्यंत 101 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होईल, असे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.
आंदोलन करणारे तरुण हिंसक झाल्याचे दिसत होते, असं ठाकूर म्हणाले. पुढे ते म्हणाले, की “यातील काही तरुण हे काही राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. तसेच आम्ही आणखी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. जाळपोळीच्या घटना घडविणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे.”
थोडक्यात बातम्या-
एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी
मोठी बातमी; ‘या’ कारणामुळे सरकार जरांगेंना पत्र पाठवणार!
मराठा आंदोलक आक्रमक; आत्तापर्यंत जीवे मारण्याचे ‘इतके’ गुन्हे दाखल
मनोज जरांगेंचा मराठा आंदोलकांना गंभीर इशारा!
आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे!