सातारा | महाराष्ट्राचं राजकारण सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ढवळून निघालं आहे. एकिकडे मनोज जरांगे पाटील सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे सकल मराठा समाज राज्यभरात विविध मार्गांनी आंदोलन करत आहे. या आंदोलनाची झळ आता राजकारण्यांना बसताना दिसत आहे.
मराठा समाजाने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे. अनेक मंत्री-आमदार तसेच स्थानिक पुढाऱ्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता फक्त गावबंदी नव्हे तर पुढाऱ्यांना आणखी एका ठिकाणी बंदी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मांढरदेवच्या काळूबाई देवस्थानशी संबंधित हा निर्णय आहे. मांढरदेवी गडावर आता राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मांढरदेवी गडावरील काळूबाई ही अनेकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरात नियमीत अनेक भाविक भक्त येत असतात. मात्र जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गडावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
मांढरदेवी गावच्या मराठा अंदोलकांनी यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला मांढरदेवी गावच्या ग्रामपंचायतीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता राजकीय नेत्यांना मांढरदेवीच्या गडावर जाता येणार नाही तसेच काळूबाईचं दर्शन घेता येणार नाही. मराठा आंदोलकांच्या या निर्णयाची आता राज्यभरात एकच चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सर्वात मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ आमदाराचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा
- “जरांगेंना काय झालं तर याद राखा,” मोठ्या अभिनेत्रीचा सरकारला इशारा
- मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर!
- सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना पुन्हा झापलं; दिला हा आदेश
- मराठा आंदोलनाला हिंसक वळण; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय