Ram Mandir | राम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. राजकारण देखील तापू लागले असून सत्ताधारी भाजपा आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. प्रभू श्री राम भव्य मंदिरात विराजमान होणार यामुळे संपूर्ण देशात उत्साह आहे. दूरदूरवरून भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. दरम्यान, हैदराबाद येथील एक वृद्ध व्यक्ती देखील रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जात आहे. विशेष बाब म्हणजे 1100 किलोमीटरचा पायी प्रवास करून हा वृद्ध अयोध्येला पोहोचणार आहे.
अयोध्येकडे कूच करणाऱ्या या वृद्ध व्यक्तीचे नाव चल्ला श्रीनिवास शास्त्री असल्याचे कळते. ते 64 वर्षांचे असून वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी चालत अयोध्येला जात आहेत. शास्त्री त्यांच्यासोबत पंचधातूंनी बनवलेल्या काही वस्तू घेऊन रामललाच्या दर्शनाला जात आहेत. पाच धातूंनी बनवलेल्या या वस्तूंची किंमत 65 लाख एवढी आहे. तसेच शास्त्री हे चपला डोक्यावर घेऊन पावले टाकत आहेत.
Ram Mandir अन् उत्साह
अयोध्येला पोहोचून या खास वस्तू उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपवण्याची शास्त्रींची योजना आहे. यापूर्वी शास्त्रींनी पाच चांदीच्या विटा मंदिराला दान केल्या होत्या. प्रभू रामाच्या वनवासाच्या विरुद्ध दिशेने शास्त्रींची वाटचाल सुरू आहे. 20 जुलै रोजी त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला.
प्रवासादरम्यान, त्यांनी वाटेत ओडिशातील जगन्नाथ पुरी, त्र्यंबक ज्योतिर्लिंग आणि महाराष्ट्रातील द्वारका या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांनाही भेट दिली. आगामी दहा दिवसांत शास्त्री अयोध्येत पोहचतील. शास्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील अयोध्येत कारसेवक होते. त्यांचे वडील हनुमानाचे परम भक्त होते.
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पायी प्रवास
अयोध्येत राम मंदिर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण आता ते या जगात नाहीत, म्हणून मी त्यांची इच्छा पूर्ण करत आहे. 20 जुलैपासून प्रवास सुरू केल्यानंतर काही दिवसांसाठी ब्रिटनला जावे लागले. पण आता मी पायी प्रवास करून वडिलांची इच्छा पूर्ण करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच ब्रिटनवरून परतल्यानंतर पुन्हा हा प्रवास सुरू केला. जिथून प्रवास थांबवला होता तिथूनच सुरू केला आहे. शास्त्री सध्या अयोध्येपासून 272 किलोमीटर अंतरावर असलेल्या चित्रकूट येथे पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत आणखी पाच जण आहेत. अयोध्येत घर बांधून कायमस्वरूपी स्थायिक व्हावे, अशी शास्त्रींची इच्छा असल्याचे ते सांगतात.
PAK vs AUS | पाकिस्तानचा दारूण पराभव पण भारताचे मोठे नुकसान, ऑस्ट्रेलिया सुसाट
Ambati Rayudu ची पलटी! 10 दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश; आता घेतला वेगळाच निर्णय
Rohit Sharma च्या चाहत्यांना सुखद धक्का; BCCI नं दिली मोठी खुशखबर
‘सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली’?; ‘या’ बड्या नेत्याचा मुनगंटीवारांना सवाल
‘Wake up sid’चा सिक्वेल येणार?; चाहत्यांची उत्सुकता शिगेला