…तर ठाकरे आणि शिंदे एकत्र येतील?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडाची महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात चर्चा झाली.एकनाथ शिंदेंच्या या बंडानं राज्यातली राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली. शिवसेनेचे दोन गट झाले आणि एकाच पक्षात एकत्र असलेले नेते आता जणू एकमेकांचे शत्रू झाले. शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट वाद अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे.

सत्तांतरानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिवसेना दुंभगल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात न्यायलयीन लढाईसोबतच शाब्दिक युद्ध रंगल्याचं पण वेळोवेळी पाहायला मिळत. दावे-प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप या सगळ्यात आता ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येण्याचे संकेत आहेत. शिंदे गटाचे नेते दीपक केसकर यांनी शिवसेना पुन्हा एकत्र येण्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकरांनी शिवसेना एकत्र येण्याचे संकेत दिले आणि राजकारणात एकच खळबळ उडाली.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांचं मन जिंकलेलं आहे. त्यामुळंच सर्व आमदार त्यांच्यासोबत गेलेत. त्यावेळी काय झालं हे मी सांगणार नाही ते मी मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवलेलं आहे. त्यामुळं एक-दोन दिवस जाऊ द्या. ज्यावेळी मी बोलेन त्यावेळी राज्यातील प्रत्येक शिवसैनिकाला सत्य समजणार, असा दावा केसरकरांनी केलाय.

एवढंच नाही पण ज्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी लढा दिला आहे ते लोक इतक्या सहजासहजी शिवसेना सोडून जाणार नाहीत. निश्चितपणे काहीतरी घडल्याशिवाय आमदार शिवसेना सोडणार नाहीत. त्यामुळं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असं वक्तव्य करत केसरकरांनी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

केसरकरांच्या या वक्तव्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. आम्हाला नाही, तर शिंदे गटालाच आत्मपरीक्षणाची गरज असून, शिंदे गटातील अर्धे आमदार भाजपात जातील असा दावाही राऊतांनी केलाय. आत्मपरीक्षण कोणी करायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं. गद्दारांनी आम्हाला आत्मपरीक्षणाबद्दल सांगू नये. आम्हाला आत्मपरीक्षणाची अजिबात गरज नाही. खरं तर त्यांनाच आत्मपरीक्षणाची गरज आहे, असं म्हणत राऊतांनी केसरकरांवरच पलटवार केला.

शिवसेना एकत्र येण्याचे संकेत केसरकरांनी दिले आणि राऊतांनीही त्यावर टीका केली. त्यात अनेक मुद्द्यांवरून शिंदे गट आणि ठाकरे गट आपआपसात भिडत आहेत. त्यामुळे केसरकरांच्या वक्तव्याप्रमाणे खरंच शिवसेना एकत्र येईल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या