Narendra Modi | मागील वर्षी 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेअर मार्केटमध्ये रस असणाऱ्यांना सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सुमारे 2 तास 13 मिनिटांचे प्रदीर्घ भाषण केले होते. आता या भाषणाला 6 महिने उलटले आहेत. या भाषणात मोदींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सरकारी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.
खरं तर इथे मोदींची गॅरंटी गुंतवणुकदारांच्या कामाला आल्याचे दिसते. कारण तेव्हापासून सरकारी शेअर्स सुसाट धावत असून चांगली कमाई करत आहेत. सरकारी कंपन्यांना अच्छे दिन आले आहेत. याला आकडेवारीची साक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 महिन्यांपूर्वी जे सांगितले होते ते आता खरे होताना दिसत आहे. मागील 6 महिन्यांत 56 सरकारी कंपन्यांनी गुंतवणूकदारांना 23 लाख कोटी रुपयांहून अधिक नफा दिला आहे.
सरकारी शेअर्स सुसाट
दरम्यान, मागील 6 महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, सरकारी शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सरकारी कंपन्यांच्या शेअर्संनी जबरदस्त परतावा दिला आहे. मोदी म्हणाले होते की, विरोधक ज्या सरकारी कंपन्या बंद होतील असे म्हणत आहेत, त्यांच्यावर आरोप करत आहे. यावर मी सांगतो की, ज्यांना शेअर बाजारात रस आहे त्यांनी सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी. विरोधकांना कोंडीत पकडताना पंतप्रधानांनी असे विधान केले होते.
Narendra Modi यांचे एक भाषण अन्…
पंतप्रधान मोदींनी आपल्या या भाषणात ज्या सरकारी कंपन्यांची नावे घेतली, त्यात देशातील सर्वात मोठ्या विमा कंपन्या एलआयसी आणि एचएएलचा समावेश होता. आता या दोन सरकारी शेअर्सचे मागील 6 महिन्यात काय झाले ते जगजाहीर आहे. LIC चा शेअर 6 महिन्यांपूर्वी फक्त 655 रुपये होता, जो आता 1029 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे 6 महिन्यांत तब्बल 57 टक्के परतावा मिळाला आहे.
दुसरी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड होती. या कंपनीने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 56.37 टक्के मजबूत परतावा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी या सरकारी कंपनीच्या शेअरचा भाव 1876 रुपयांच्या आसपास होता, तो आता 2933 रुपयांपर्यंत वाढला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना एका शेअरमधून 1000 रुपयांपेक्षा जास्त नफा मिळाला आहे. अशा स्थितीत या शेअरमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार आज चांगला परतावा मिळवत आहे.
56 कंपन्या आणि 23.7 लाख कोटींची कमाई
एलआयसी आणि एचएएल व्यतिरिक्त एक-दोन नव्हे तर अशा सुमारे 56 सरकारी कंपन्या आहेत, ज्यांच्यात मागील 6 महिन्यांत 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी या शेअर्समधून 23.7 लाख कोटी रुपयांचा मोठा नफा कमावला आहे. या काळात एनबीसीसीसारख्या शेअर्संनी देखील गुंतवणूकदारांना खुशखबर दिली आहे.